Search This Blog

Friday, 23 March 2018

शंकरा... उघड तिसरा डोळा


शंकरा... उघड  तिसरा  डोळा 



निव्वळ पुरोगामी विचारांचे नाही तर शिक्षित असूनदेखील अशिक्षितांसारखे वागणारे लोक समाजात बदल करण्याचं सोडून स्वत:देखील त्यात सहभागी होतात. महाराष्ट्रातील बहुतांश लोक हे धर्मसत्तेत बुडालेले आहेत. बरेचसे लोक आसतिक आहेत. काही लोक नासतिक आहेत. आसतिक लोकांपैकी काही लोक मन:शांतीसाठी देवदर्शन करतात. काही लोकांना खरोखरंच देवावर विश्वास आहे आणि अनुभवदेखील आहे. परंतु मंदिरातील भक्तांच्या भक्तीने देवाचा श्वासदेखील गुदमरतोय एवढी अतिशयोक्ती काही लोक करतात.काही माणसे इतकी अंधश्रद्धाळू असतात ते विचार न करता गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि लोकांच्या भक्तीचा फायदा घेत काही लोक त्याचा धंदा करतात.
काही लोक तर देवाला इतकं कवटाळतात की देवाचा श्वास गुदमरतोय की काय असे वाटते. आपल्याला जीवन देणारा देवचं आता लोकांकडे जीवनदान मागतोय असं मला वाटतंय. एकीकडे देवाच्या पवित्रतेचे महत्त्व समजावणारे लोक स्वत: देवाची विटंबना करतात. मिठी मारतात. चार दिवस मासिकपाळीच्या वेळी बाईला लांब बसवून तिला तुच्ठ लेखणारे लोक स्वत: प्रवास करून, चालत येत असताना त्यांना किती महिलांचा धक्का लागत असेल ही झाली पहिली बाजू आणि रोजगार मिळण्याच्या नादात कित्येक महिला ज्यांच पोट हे यावर भरत असेल त्या फुलं तोडण्याचं काम करत असतील शिवाय फुलविक्रेत्या महिला, प्रेतावरून येणारी जाणारी लोक थोडी सांगणार आहेत की आम्हाला शिवू नका. एवढ्या गर्दीत धक्काबुक्की होणारचं.
तसंच माझ्या डोळ्यासमोर असलेलं उदाहरण म्हणजे बागुलनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी होणारी भक्तांची गर्दी. माझं स्वत:च वैयक्तिक मत असं आहे की देवावर श्रद्धा असावी अंधश्रद्धा नाही. आपल्या भक्तीचे प्रदर्शन लोकांना का करायचं. भक्ती असावी. ज्याने आपल्याला घडवलं त्याला मनापासून नमस्कार किंवा साष्टांग नमस्कार घालावा. त्याला इतकंच बोला तुझी सेवा माझ्या हातून चांगल्या पद्धतीने घडवून घे बघा कसा पाठीशी उभा राहतो तो. चुकली माखली सेवा माफ कर अस बोलून दर वेळी तुम्ही चुका करणार. तो देव आहे. उत्पत्ती- विनाश त्याच्याच हातात आहे हे लक्षात असू द्या.
पाऊण तास आरतीसाठी रांग थांबली तर काही लोक खरचं भक्तीपोटी प्रतिक्षा करतात पण भक्तीचे अवडंबर माजवणारे लोक बडबडतात. म्हणजेच ते मनापासून देवदर्शन करत नाही तर दिखावा करतात. खरचं जर सहजासहजी देव भेटला तर जीवन धन्यच होईल नाही का? एवढंच नाही तर हेच लोक गाभा-यात जाऊन स्वत:च्या समाधानासाठी व्यवस्थित पाया पडायला भेटलं नाही म्हणून पुढे जाऊन फुलं अक्षरश: फेकतात. काही लोक तर दुधाच्या पिशव्या जसं रंगाच्या रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर फोडतात अगदी तसंच महादेवाच्या अंगावर त्यांचा अभिषेक करतात. याला खरंच अभिषेक म्हणतात का? तुम्हीच सांगा आता. असे बावळट लोक स्वत:च्या समाधानासाठी देवाची विटंबना करतात हे सत्य आहे. देवाकडे थोडीशी बुद्धी मागितली असती तर बर झालं असतं नाही का?
भक्तीचं अवडंबर माजवणा-या लोकांनी या सर्व गोष्टींचा खरच मनापासून विचार केला पाहिजे. आपण काय करतोय हे लक्षात घेतले पाहिजे. देव बोलत नाही माझ्यासाठी हे केलंच पाहिजे. हा तुमचा भाव आहे. पण त्याचा अतिरेक नको व्हायला. हा मेसेज १० जणांना पाठवला तर चांगली बातमी आज कानावर येईल असं हल्ली सर्रास चालू आहे. खरंच असं झालं असतं तर घरबसल्या मी हेच केलं असतं. श्रद्धेचा बाजार नका करू. मनापासून भक्ती करा. नाही तर खरंच शंकर तिसरा डोळा उघडून सर्व भस्मसात करेल.

शब्दांकन: अमृता घुमरे-कारेकर 


No comments:

Post a Comment

ध्येय कधी सोडू नको !!!

ध्येय कधी सोडू नको !!! काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य, नशीबाला शिव्या देत, प्रयत...