Search This Blog

Friday, 23 March 2018

ये १५ मिनिट तुमसे कोई छीन नहीं सकता



ये १५ मिनिट तुमसे कोई छीन नहीं सकता 


आयुष्य किती वर्ष या पेक्षा त्या आयुष्यातील तो किती क्षण जगला हे महत्वाच .कपिलच्या बाबतीत तो रिचर्डचा झेल आणि वर्ल्डकप असेल ,अजित वाडेकरांच्या बाबतीत तो सोबर्सला फॉलोओंन देण्याचा क्षण असेल ,चंद्रशेखरची कदाचित ओव्हल वरील नॉटची विकेट घेण्याचा क्षण असेल ,धोनीचा तो वर्ल्डकप जिंकताना मारलेला शेवटचा षटकार असेल ,प्रत्येकाचे हे क्षण ठराविकच असतात कि ते त्याची आयुष्यभर साथ देतात आणि त्याला त्यांच्या मृत्यू पश्चात अजरामर करतात .या त्यांच्या मखमली आठवणी अत्तराच्या कुपीत जपून ठेवण्यासारख्या असतात .दिनेश कार्तिक हा किती चांगला फलंदाज होता किंवा यष्टीरक्षक होता हे कुणालाही पुढे लक्षात राहील अस नाही ,कदाचित तो तेवढा मोठा फलंदाज आहे असही नाही .पण काल तो ते ८ चेंडू आपल आयुष्य जगला .चकदे मध्ये आहे ना "ये ७० मिनिट ,तुमसे कोई छीन नही सकता" तसच ती शेवटची १५ मिनिट दिनेश पासून आता कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही .त्यातील एक स्कूप सोडला तर बाकीचे फटके हे सगळे सरळ बॅटने खेळलेले ,वर्षानुवर्ष क्रिकेट भीष्मांनी वापरलेले होते कुठेही आडवा तिडवा ,रामभरोसे प्रकार नव्हता .शेवटचा कव्हर वरून मारलेला छकडा तर लाजबाब आणि हे डोक्यावर प्रचंड दडपण असताना .स्कोअर बोर्ड गाढव असतो हे अशावेळी सिद्ध होत .काही वर्षांनी लिहिलेल्या इतिहासात दिनेश कार्तिक नाबाद २९ एवढच दाखवेल पण त्यातील प्रत्येक धावे बरोबर भारत आणि बांगलादेश मधील लाखो ,करोडो क्रिकेट प्रेमीची अवस्था पुढील पिढीला समजणार नाही .अठराव्या ओव्हर मध्ये चार चेंडूवर एकही धाव नाही ,पाचवी वर लेग बाय आणि सहाव्या चेंडूवर विकेट हे बघताना भारतातील क्रिकेट प्रेमीच्या हृदयातील एकेक पणती कशी विझत जाऊन अंधार होत चालला होता आणि बांगला देश मध्ये कशी रोषणाई सुरु झाली होती हे पुढील पिढीला समजणार नाही .एकोणिसाव्या ओव्हरला पुन्हा भारतात एकेक पणती उजळत गेली ,विसाव्या ओव्हरला पहिल्या तीन चार चेंडूत पुन्हा हि ज्योत कशी वाऱ्याने फडफडायला लागली ,आणि शेवटच्या चेंडूवर एडिसनला जणू दिव्याचा शोध लागल्यासारखे कसा सगळीकडे लखलखाट झाला हि गंमत कळणार नाही .दिनेश कार्तिक हे क्षण ,हि पंधरा मिनिट यांच्यावर फक्त तुझा हक्क आहे .

शब्दांकन: वीरेन्द्रसिंह उत्पात 

No comments:

Post a Comment

ध्येय कधी सोडू नको !!!

ध्येय कधी सोडू नको !!! काम  असेल कठीण, नसत कधी अशक्य पूर्णविराम नंतर तर ,संपत रे पूर्ण वाक्य, नशीबाला शिव्या देत, प्रयत...